शहापूर : तालुक्यातील वाशाळे (कसारा) येथे डोळखांब एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने ‘महिला व कायदे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात कसारा-देऊळवाडी येथील अॅड. रेखा सावंत यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी अॅड. कल्पेश पाटील, उपसरपंच श्री. धानके, प्रा. काव्या पाटील, प्रा. निर्मला पांढरे यांसह बचत गटातील महिला उपस्थित होत्या. अॅड. सावंत यांनी व्याख्यानादरम्यान कौटुंबिक हिंसा कायदा, महिला संरक्षण अधिनियम २००५ याबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘स्त्रियांसाठी एक, दोन नव्हे, तर तब्बल ४० कायदे असूनही महिला असुरक्षित आहेत. महिलांचा आवाज दबविला जातो. यासाठी सर्वांची एकी होणे गरजेचे आहे,’ असे अॅड. सावंत यांनी सांगितले.
अॅड. कल्पेश पाटील म्हणाले, ‘भारतात दरवर्षी ४० हजार डॉक्टर सहा लाख मुलींचे गर्भपात करतात. महिला सर्व क्षेत्रात पुढे आहेत. जिद्दीमुळे आज त्या डॉक्टर, इंजिनीअर, वकील या पदांवर पोहोचल्या आहेत. पहिल्या मराठी राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला हिंदू कोड बिल तयार केले. आज समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो. यात आपली मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषप्रधान संस्कुतीमध्ये स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते.’ याप्रसंगी अंतराळवीर कल्पना चावला यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
उपसरपंच प्रा. पाटील यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य केले. कविता जगताप यांनी सूत्रसंचालन केले.